Sunday, June 28, 2009

केल्याने भटकंती -(मस्तानी तलाव) -२


कालच्या पावसाने तलाव हळूहळू भरायला सुरुवात झाली होती. लालसर चिखलाच्या त्या पाण्याने तलावाचा काही भाग भरला होता. "अरे ते बघ काय !" "साप दिसतोय की काय?" दीप आणि ओंकारच्या या बोलण्याने आम्ही आमच्या थेट खाली असलेल्या पाण्यात पाहू लागलो. तेथे फक्त साप नव्हता, त्या सापाने कोणालातरी पकडलं होतं. बेडूक की काय तो? हो बेडूकच.

पण एवढ्या उंचीवरून आम्हाला ते काही नीटसं दिसेना! तिथे लगेचच खाली दुसरी एक जागा त्या तलावाच्या तटबंदीत होती. एक मजलाच म्हणा हवं तर. आम्ही लगेच तिथे उतरलो. अगदी उकिडवं बसून ते नेमकं काय करतायत पाहू लागलो. सापाने आपल्या जबड्यात त्या बेडकाला पकडलं होतं आणि तो बेडूक मोठ्या निकराची झुंज देत होता. सापाच्या तावडीतून स्वतःला सोडवू पाहत होता. आम्हाला एक गोष्ट कळेना की बेडूक एवढ्या ताकदीने कसा काय लढतोय? -- मिनिटं झाली! तरीही त्यांची कुस्ती संपेना! "अरे हा तर पाणदिवड आहे! निमविषारी साप! पण बेडकाला त्याचं विष पुरेसं होईल. आतापर्यंत तो संपायला हवा होता! पक्षीनिरीक्षक दीपने परत एकदा माहिती पुरवली. "हो का ! अरे बर! पण एकूण विषारी जाती चारच ना ?" इत्यादी प्रश्नोत्तरं चालू होऊन त्यात - मिनिटं गेली. एवढ्या वेळेपर्यंत त्या सापाने बेडकाला तलावाच्या तटबंदीशी असलेल्या आपल्या तटबंदीशी आणलं होतं. आता त्यांची कुस्ती "साँप की गली में" चालू झाली. आता तरी हे नाटक संपेल असं वाटलं होतं. पण छे! आता तर खेळाला अजूनच रंग चढला! एक वेळ तर अशी आली की बेडूक जवळजवळ सापाच्या तावडीतून सुटलाच होता. - मिनिटांनी आम्हीच कंटाळलो आता मात्र आम्ही ते बघायचा नाद सोडून दिला. (कॅमेऱ्याचं zoom यथातथाच असल्याने याचे फोटो काढण्यात काहीच अर्थ नव्हता!)

पण एक मात्र खरं, आपण नेहमी discovery/NatGeo वर असल्या गमती पाहतो; त्या प्रत्यक्ष बघायला जी मजा येते ती निराळीच! आणि मला एक जाणवलं ते असं की यासाठी काही फार दूर कुठे जंगल-सफारीवरच जायला पाहिजे असं नाही. जरा गावाकडे गेलं की असल्या अनेक गमती पहायला मिळतात. खरंच, multiplex मध्ये जाऊन सिनेमे पाहणं काय, किंवा TV समोर बसून स्वतःची करमणूक(स्वतःवर अत्याचार?) करवून घेणं काय; या सगळ्यात किती मोठ्या आनंदाला मुकलोत आपण असं वाटतं कधीकधी!

तटबंदीवरून जरा चक्कर टाकूया असं ठरवून आम्ही चार पावलं जातोय तोच आम्हाला एक भुयार दिसलं.

काळोखात गेलेल्या त्या पायऱ्या कुठे घेऊन जात असतील बरं आपल्याला. "पाहूयात का उतरून? नको, आत पाणी असलं म्हणजे?"- आलोकचा प्रश्न. "पाण्याचं काही नाही, आत जाम कुबट वास येत असेल! शिवाय वटवाघळं आली तर नसता ताप व्हायचा!" -इति दीप. शेवटी जरा बेताबेताने आत जाऊन बघू, असं ठरवत आम्ही पायऱ्या उतरू लागलो.

कालच्या पावसाने इथे आमच्या चपलांना चिखल चिकटू लागला. कोळ्यांची जाळी खूप होती तिथे. दीप, ओंकार, आलोक मी या क्रमाने आम्ही आत उतरलो. त्या तिथे गेल्यावर काहीच दिसत नव्हतं.पण - मिनिटात अस्पष्टसा अंदाज येऊ लागला. सगळेजण डोळे फाडफाडून जागेचा अंदाज घेऊ लागले.

मी सगळ्यात मागे असल्याने जरा - पायऱ्या वर होतो. पायऱ्यांवरूनच फोटो कसा घेता येतोय याचा विचार करत होतो. "अरे ते बघ इथून सरळ वरचं दिसतंय", दीप म्हणाला. त्या पायऱ्यांच्या शेवटी डाव्या बाजूला प्रकाश होता. तटबंदीच्या सर्वात वरच्या भागाला (भुयाराच्या छपराला म्हणा हवं तर) असलेल्या झरोक्यातून तो प्रकाश येतोय असं कळलं. उजवीकडे मात्र एक दीड-दोन फुटावरच भिंती दिसल्या.

हे असं बंदिस्त भुयार का बर केलं असेल? असो. ओंकार आणि आलोक आता वर निघून गेले, आणि मी तो झरोका पहायला भुयाराच्या शेवटी गेलो. एव्हाना मला दीपला तिथे चांगल्यापैकी दिसू लागलं होतं. झरोका तर मी पाहिला.
पण उजवीकडे पाहिल्यावर आता काही वेगळंच दिसलं- तिथे अजून पायऱ्या होत्या, खाली जाणाऱ्या! वारे किस्मत! मघाशी चुकून जरी कोणी उजवीकडे पाय टाकला असता तर तो कुठे जाऊन पडला असता कुणास ठाऊक! आमच्याकडे तर कोणाच्या मोबाइलमध्येही torch नव्हती !


"आता झालं एवढं धाडस पुरे" असं म्हणून आम्ही वर आलो. वर आल्यावर तिथल्या एका पोराकडून कळलं की ते भुयार त्या मघाचच्या आजोबांच्या देवळापाशी बाहेर पडतं.


तटबंदीवरून पुढे जाता जाता आम्हाला कळून चुकलं की तटबंदीचा पाहण्यासारखा मुख्य भाग अगदी थोडा आहे. थोडं पुढे तलावात जाणारा घाट आहे. पण तो मात्र बहुतांशी मोडकळीस आलाय. तिथून तलावाची तटबंदी मात्र अक्षरशः "सुरेख" दिसते. आता थोडं "तलावात" फिरून परत फिरू असं वाटलं. कारण आता त्या आटलेल्या तलावात अजून फारसं काही दिसत नव्हतं आणि आम्हाला परतही जायचं होतं.




पण त्यातही जाता जाता एका झाडाची नक्षीदार मुळं आम्हाला बघायला मिळाली.



साचलेल्या पाण्याच्या काठाने आम्ही पुन्हा तटबंदीवर आलो. आता तशी एकच गोष्ट बघायची राहिली होती ती म्हणजे तलावाच्या तळापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या. आणि तिथे असणारे कोनाडे. "तिथेही काही भुयार वगैरे आहे का ते पाहू" ओंकार म्हणाला. मघाशी तलावाच्या आत असताना त्या पायऱ्यांचा "V" आकाराचा फोटो काढून झाला होता.



पण त्या १० बाय १० च्या कोनाड्यात ना कसलं देऊळ होतं ना कसली ना भुयार ना कसली विशेष व्यवस्था! मग शेवटी त्या पायऱ्यांवर बसून आम्ही आमचेच फोटो काढत सुटलो.



फोटोची पुरेशी हौस भागल्यावर आता मात्र आम्ही परत फिरायचं ठरवलं. ज्या देवळापाशी आम्हाला मस्तानी तलाव इथेच आहे असं कळलं तिथे अजून एक विहीर होती. मग तिच्यात डोकावून बघ, खोली किती, पाणी किती असले नित्य उद्योग चालू झाले असता त्या विहीरीत एका भुयाराचा शेवट दिसला. अरे, हेच ते भुयार ज्यात आम्ही मघाशी उतरलो होतो. पुन्हा एकदा उजवीकडच्या dead end मध्ये आम्ही अतीचिकीत्सक होऊन पाय ठेवला नाही याचं समाधान वाटलं! आपलाकडे अशा ऐतिहासिक भुयारांना बंद का करतात ते मला कळत नाही. आताचं हे भुयार तर जेमतेम - मजले खोल असेल. पण ऐतिहासिक ठिकाणं चांगली पर्यटन स्थळं बनू शकतात हे मुळी आम्हाला कळतंच नाही. अशा सुंदर ठिकाणी गेलं की या ठिकाणी अजून खूप करण्यासारखं आहे असं वाटत राहतं.

आता आम्ही परतीच्या वाटेवर होतो. गाड्यांपर्यंत पोहोचताच आम्ही निघालो, या वेळी मात्र गावातून जाणाऱ्या पक्क्या रस्त्याने. आता लवकरात लवकर पुणं गाठायचं होतं. पण तरीही साधं पाणीही बरोबर घेता दुपारी त्या तलावात पायपीट केलेली असल्याने ऊसाचा रस प्यायचा मोह काही आम्हाला आवरला नाही. हडपसर यायच्या आधीच एका गावात थांबून आम्ही ते "रसपान" केलं.

येताना मात्र फार वेळ लागला नाही. शिवाय आज पावसाने पूर्णच रजा घेतली होती. ऊन पावसाचा खो-खो सुध्दा आता मंदगतीने चालू होता. आता पावसाळ्यात परत येऊन तो तलाव पहावाच, तो पहायला मिळो असं म्हणत आम्ही आपापल्या घरी गेलो.



Wednesday, June 24, 2009

केल्याने भटकंती -(मस्तानी तलाव) -१

(हे माझं पहिलंच प्रवासवर्णन , प्रवासवर्णन म्हणाव का? खरं तर उन्हाने पार कंटाळलेला असताना मी या भटकंतीला गेलो. त्याचं वर्णन करावंस वाटलं, म्हणून लिहितोय. माझ्या इतर लेखांहून थोडं निराळंच आहे हे. त्या वेळी चुकलं इतकच की camera घेतला नव्हता. त्यामुळ सगळे फोटो samsung मोबाइलच्या 2 megapixel कॅमेऱ्याने काढले आहेत!)



पावसाची वाट पाहून आता कंटाळा आला होता. मुंबईतल्या पहिल्याच उन्हाळ्यात माझं शरीर आणि मन अगदी गळून गेलं होतं.
पण एस.टी. ने लोणावळा स्टॅण्ड गाठला आणि अंगाला गुदगुद्या करणारा गारवा जाणवू लागला. मी ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो त्या सृष्टीनाट्याची नांदी इथे अशी झाली.
पुण्यात गेल्यावर पावसाची भेट झालीच! खरंच, पहिल्या पावसात चिंब भिजायचा, उन्हाळ्यात नदीच्या पाण्यात मनसोक्त खेळायचा आणि हिवाळ्यातल्या गर्द धुक्यात तोंडातून धूर सोडायचा आनंद काही औरच. पहिल्या पावसाने सुखावलेला मी आता उद्या कुठे भटकायचं याचा विचार करू लागलो.
सिंहगडावरच जायचं होतं खरं तर पण एकतर उशीरा उठलो. ओंकार(आमचे बंधुराज) तर बरोबर येणार होताच, पण अजून कोण येणार ते नक्की नव्हतं. दीप(माझ्या शाळेतल्या अनेक वल्लींपैकी एक, मुंबई ते चिपळूण सायकल प्रवासासारख्या अजब करामती करणारा) ‘हो’ म्हणाला तोपर्यंत उशीर झाला होता.

ओंकारचा एक वर्गमित्र- ‘आलोक(हासुद्धा माझ्यासारखा नाटकं, कविता यात रस असणारा आणि तरीही science चा विद्यार्थी)’ यायला तयार होता, पण त्याचं दुपारी १२ पर्यंत काम होतं. आणि मला संध्याकाळी ६ पर्यंत परत यायचं होतं.















तर अशा विचित्र अटींवर सिंहगडाशिवाय अजून कुठे जाता येइल याचा विचार करत होतोच.
ते रांजणखळग्यां (potholes) चं गाव, ‘निघोज’, त्याची माहिती काढून झाली, तर ते ९० किमी लांब! झालं ! म्हणजे ६ तासात ते अशक्यच!

"
मस्तानी तलाव". तिथे जायचं होतंच. पण २-३ मित्रांना विचारल्यावर, "दिवेघाटाच्या पायथ्याशी आहे कुठेतरी, पण इतकं काही नाहीए विशेष!" असं कळलं.
आमच्याकडे दोन दुचाकी(सोप्या मराठीत 2-wheelers) होत्या. स्कूटी व प्लॅटिना. कुठेतरी जायचं जरूर होतं. आणि वेळेचं बंधन होतं. अशा या परिस्थितीत मस्तानी तलावावरच जायचं ठरंलं.

दुपारी एक दिडच्या सुमारास निघालो. दीप व आलोक प्लॅटिनावर आणि आम्ही (मी व ओंकार) स्कूटीवर असे निघालो. वाहनचालक अर्थातच मी व दीप. रस्ता तसा सोपा होता. म्हणजे फार वेळा विचारावं लागला नाही. कॅम्पमधून जाता येता ‘हडपसर’ ची पाटी वाचली होतीच. त्यामुळे साधारण कसं जायचं त्याचा मी मनात एक आराखडा बनवला होता. तरीही एकदा आमची चुकामूक झालीच.परत
सासवड रस्त्याला लागेपर्यंत १५-२० मिनिटं गेलीच.

सासवड रस्त्याला दिवेघाट दिसायला लागला की थोडं आधी ‘वडकी’ गावातून मस्तानी तलावाकडे जाणारा फाटा लागतो. हा रस्ता बहुतांशी डांबरी आहे. पण तलाव घाटाच्या पायथ्याशी आहे असं कळल्याने आम्ही घाट अगदी अर्ध्या-एक किलोमीटर्वर येईपर्यंत जात राहिलो. इथे ‘सकाळ’चा प्रेस आहे, त्याच्या समोर, म्हणजे रस्त्याच्या डावीकडे मस्तानी तलावाकडे जाणारा एक कच्चा रस्ता आहे. आज पाऊस असता तर या रस्त्यावरून जाणं कठीणच होतं. पण आज नुसता ऊन आणि मळभ यांचा खो-खो चालू राहिला होता. काही अंतर गेल्यावर आता तलाव जवळ आला असावा आणि आता स्कूटीचा आणखी छळ करणं बरोबर नाही असं वाटून आम्ही गाड्या तिथेच लावल्या आणि चालू लागलो.

आजूबाजूला शेतं होती, वांगी आणि सीताफळांची. आम्हा शहरी पोरांना अशी शेतं बघितली तरी कोण आनंद होतो! शिवाय वाटोवाट साधारण ७-८ मीटर व्यासाच्या मोठाल्या नि खोल विहिरी होत्या.

जाता जाता दीप आपलं पक्षीनिरीक्षण कौशल्य पुन्हा आठवीत आम्हाला ‘हा आवाज तमक्याचा, हा अमक्याचा, हा पक्षी .... ’ असलं काहीतरी सांगत होता. पण वाटेने पुढे जाता जाता तलाव येइल अशी चिन्हे दिसेनात. आम्हाला जरा अशी शंका येते तोच तिथे एक घरटं नि शेजारी एक देऊळ दिसलं. त्या घराच्या मागे थोडा उंचवटा होता. १५ फूट उंचीचा असावा साधारण. तिथल्या बागुलबुवासारख्या दिसणा्ऱ्या, लांबलचक दाढी असणाऱ्या आजोबांनी तलाव तिथेच मागे असल्याचं सांगितलं. आणि चार पावलं चालल्यावर " वडकी जलसंधारण........ मस्तानी तलाव " की असली काहीशी पाटी दिसली. त्या पाटीचा फोटो मात्र राहून गेला! असो.

त्या घरामागच्या उंचवट्यावर गेल्यावर समोरच दिसला - "मस्तानी तलाव". आम्ही एकदम खूश झालो. तिथे असणाऱ्या गणपतीच्या देवळात माणसं उगीच काही माणसं काहीतरी गप्पा मारीत बसली होती. आता पुल म्हणतात त्याप्रमाणे बायकाच केवळ "कऽस्सऽऽलीऽऽ भाऽऽनगड?" असं विचारतात असं नाही. कधीकधी पुरुषही तशा वायफळ गप्पा मारताना दिसतात. त्यातलाच हा नमुना होता. पण नंतर लक्षात आलं ते मेंढ्या घेऊन आले होते. नि त्यांच्या शेळ्यामेंढ्या त्या विस्तीर्ण आणि विशाल अशा सुकलेल्या तलावात आरामात चरत होत्या. खरंच, त्या तलावाकडे पाहिल्यावर "विस्तीर्ण, विशाल, भव्य" इतकेच शब्द आठवतात.

केवढा हा तलाव! एका क्रिकेटच्या मैदानाएवढा तरी असेल. मोजकंच पण व्यवस्थित असं दगडी बांधकाम, एका बाजूला गणपती मंदिर, एका बाजूला घाट(पायऱ्या), एका बाजूला दिवेघाट आणि बाकी आजूबाजूला किरकोळ झाडी आणि शेतं ... अहाहा पावसाळ्यात हा परिसर काय नयनरम्य दिसत असेल! अर्थात आम्हाला तो आजही सुरेखच दिसत होता.

पुढे जाऊन तळ्यात वाकून पाहिलं; बापरे केवढी ही खोली. जवळजवळ ४५ फूट तरी असेल. पण एक मात्र खरं, तलाव हा सर्व ठिकाणी समान खोल नाही. आम्ही उभे होतो ती
तलावाची सर्वात खोल बाजू होती. व्यासाच्या दुसऱ्या टोकाला जेमतेम दोन अडीच माणूस उंचीचा तो तलाव पाहत आम्ही उभे होतो.


Thursday, June 11, 2009

चातकांतर

रे रे चातक सावधानमनसा मित्रं क्षणं श्रूयताम् ।
अम्भोदा: बहवो वसन्ति गगने सर्वेऽपि नैकादृशा: ॥
केचिद्वृष्टिभिराद्र्यन्ति धरणिं गर्जन्ति केचिद्वृथा ।
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः ॥
-भर्तृहरि
मित्र चातका, थांब क्षणभरि, ऐक बोलणे माझे
हर एका मेघास विनविणे हे तुजला साजे;
समान नसति सर्व जाण पा , मेघ बहू दिसती जे
आर्द्रावती कुणी क्वचित् धरेला, गर्जति बाकि वृथा ते !

हा भर्तृहरिच्या काळातला चातक आजही वर्षेच्या आगमनाकडे डोळे लावून बसला आहे.
पण आज मात्र त्याला वेगळी प्रार्थना करावी लागेल. कारण त्या वेळच्या व आजच्या चातकामध्ये थोडे अंतर तर आहेच ना !

रे रे चातक सावधानमनसा मित्रं क्षणं श्रूयताम् ।
अम्भोदा: बहवो वसन्ति गगने सर्वेऽपि ते वञ्चका: ॥
भुवनेऽस्मिन् मनुशोषिते दूषिते वर्षाऽपि रुष्टा खलु ।
प्रार्थय मानवं , स्वमंत्रितं भूपतिं तेनैव एतद्कृतम् ॥

रे रे चातक सावधान बनुनि ऐक माझे जरासे
ना कोणा मेघास आज विनवू सर्वेच फसवे असे ;
वर्षाही रुसली मनुष्यजगति या शोषणे दूषणे
कर्ता मानव, त्यास जा विनव, जो राजा स्वतःला म्हणे !