Saturday, July 10, 2010

पाटीवरची "अक्षरे"!


आपण लहानपणी पाटी वापरतो. पूर्वी पाटीवर "श्रीगणेशा"ने अक्षर ओळख व्हायची आणि आता किंवा कदाचित A B C D ने होते. मग हळूहळू "दुरेघी" वही, मग कदाचित पाढे लिहायला चौकटी असलेली वही, आणि हळूहळू मोठ्या वह्या. हे असं होताना आपणही तसेच बदलत असतो. पाटीवर लिहिलेलं फार काळ लक्षात काय, पण तिथे पाटीवरसुद्धा रहात नाही. डाव चिडीचा असो वा रडीचा अगदी दोन घटकांचा डाव असतो लहानपणी . पण नंतर मात्र आपण "(बि)घडू" लागतो आणि स्मृतीच्या वहीत अनेक गोष्टी लिहू लागतो. काही वह्या जपून ठेवतो. काही फेकून देतो. पण अशी बरीचशी नको असलेली रद्दी आपण जपलेली असते. काही वह्यांचे नुसतेच कागद! पण बऱ्याचशा वह्या आपण उगीचच जपूनच ठेवत असतो आणि आपण मोठे झालो असं म्हणतो. पण लहानपणी जे सारखं मोठं व्हावसं वाटतं ते मोठं झाल्यावर आपण सदैव दुःखी! कारण लहानपणी ज्यावर अक्षरं गिरवली ती पाटी, ते "अक्षर" आपण विसरतो.
"आत्ता
आहे ते आहे! बास!, हे पुसलं जाईल हे माहित आहे; आधी काय होतं कुणास ठाउक!; आणि हे पुसल्यावर मी काय लिहीन काय ठाउक? किंवा मीच लिहीन असंही नाही!" असं असतं लहानपण, पाटीसारखं! ती पाटी आपण हरवतो आणि तो आनंदही; निर्भेळ वर्तमानाचा आनंद! भूत भविष्याच्या चोपड्या सांभाळण्यात अख्खी जिंदगी हरवते आणि शेवटी आपण रडतो,"आणि एवढं करून आपल्या जीवनाची पाटी कोरीच राहिली!."